पुणेः : हत्या कुठे झाली, कुणी केली आणि आरोपी किती लांब गेले, यावर कधीच तपासाची प्रगती अवलंबून नसते.
पोलिसांचे नेटवर्क चांगले असेल, तर कोणत्याही प्रकरणातील आरोपींना लगेच अटक करता येऊ शकते, हे सातारा पोलिसांनी दाखवून दिले आहे.
पाच तासांतच बेड्या
दारुच्या वादातून तरुणाची कराड तालुक्यात हत्या केल्या प्रकरणी पुण्यातून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
धारदार हत्याराने वार केल्यानंतर तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी अवघ्या पाच तासांतच दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
दारु पिण्याच्या वादातून हत्या
कराड तालुक्यात शनिवारी सकाळी चौंडेश्वरी नगर गोवारे या ठिकाणी मळी नावाच्या शिवारात ही घटना उघडकीस आली होती.
या घटनेची दखल घेऊन सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 5 तासांत या गुन्ह्यातील आरोपींना शोधून काढले. दारू पिण्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याचा आरोप आहे.
शनिवारी कराड येथील खुनाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह घटनास्थळी भेट दिली.
गोपनीय माहितीच्या आधारे माहिती घेतली असता दारू पिण्याच्या कारणातून हा खून झाला असल्याची माहिती समोर आली.
हे आहेत आरोपी
त्यानुसार अवघ्या पाच तासात या गुन्ह्यातील 23 वर्षीय आरोपी आकाश अनिल गवळी आणि 25 वर्षीय अक्षय अनिल गवळी (दोघे रा. चौंडेश्वरी नगर, कराड)
या दोन्ही आरोपींना पुण्याहून अटक केली. कराड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.