मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी यांचं प्रेम असलं, की त्याकडं लगेच लव-जिहाद म्हणून पाहिलं जातं. दोन्ही कुटुंबीयांची संमती असली, तरी दोन्ही समाज त्याला विरोध करतात, असाच अनुभव पुण्यातील कुटुंबाला आला आणि धमक्या द्यायला सुरुवात झाली.
लव्ह जिहादचा रंग
दोघांच्या घरच्यांच्या सहमतीनं एक मुस्लिम मुलगा हिंदू मुलीसोबत लग्न करण्यासाठी न्यायालयात गेला होता. याबाबतची नोटीस फलकावर लावण्यात आली होती.
अज्ञात व्यक्तीनं ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल केली. यानंतर अनेकांनी संबंधित जोडप्याला धमक्या द्यायला सुरुवात केली आहे.
पुण्यातील हे जोडपं उच्चशिक्षित असून दोघांच्या घरच्यांच्या सहमतीनं लग्न करण्यासाठी न्यायालयात गेलं होतं; मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण या लग्नाला लव्ह जिहादचा रंग देत आहेत.
नाशिकमध्ये रद्द करावं लागलं लग्न
अनेकजण सोशल मीडियावर ही नोटीस शेअर करत संबंधित जोडप्यानं लग्न करू नये असं आवाहन केलं जात आहे. अशाच प्रकारची एक घटना नाशिकमध्येदेखील घडली आहे.
बाहेरील लोकांच्या विरोधामुळे संबंधित जोडप्याला आपलं लग्न रद्द करावं लागलं आहे. या प्रकरणी राईट टू लव्ह ही संस्था गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांकडे धाव घेणार आहे.
या प्रकरणी ब्राह्मण महासंघ, मुस्लिम सत्यशोधक संघटना आणि राईट टू लव्ह या संघटनांनी विविध दावे आणि आरोप केले आहे.
घटना नेमकी काय ?
नाशिकमध्ये हिंदू तरुणीचा आणि मुस्लिम तरुणाचा विवाह हा 18 जुलैला होणार होता. त्यासाठी दोन्ही कुटुंबीयांकडून सगळी तयारी करण्यात आली होती.
एका बड्या हॉटेलात हा लग्न सोहळा पार पडणार होता; मात्र लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या घरच्यांना काही लोकांनी विरोध करायला सुरुवात केली, तर अनेकांनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली.
अज्ञात लोकांकडून येणाऱ्या धमक्यांमुळे कुटुंबीयांवर लग्न रद्द करण्याची वेळ आली आहे. मुलगा मुस्लिम असल्यानं अनेकांकडून या लग्नाला विरोध होत आहे.
धमक्या देणं चुकीचं
याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, त्यांनी म्हटलं की नेमकं प्रकरण काय आहे, हे मला माहिती नाही; मात्र हा विवाह जर कायद्यानं होत असेल, तर त्यावर धमक्या देणं चुकीचं आहे, तरीही धमक्या येत असतील, तर मात्र कायद्यानं यामध्ये लक्ष घातलं पाहिजे.