एमएमआरडीला सुरक्षा रक्षक पुरवण्यात आम्ही कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला, असा माझ्यावर आरोप होत आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात या संदर्भात तक्रार दाखल झाली. या प्रकरणाचा तपास नंतर ईडीने स्वत:कडे घेतला.
हा घोटाळा झाला आहे, की नाही, याचा तपास करण्याची राज्य सरकारचीसुद्धा जबाबदारी आहे, अशा शब्दांत ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आपली बाजू मांडली.
सात महिन्यांपासून तपास यंत्रणांना जातोय सामोरा
देशमुख यांच्याप्रमाणे सरनाईकही ईडीच्या रडारवर आहेत. सरनाईक यांनी संदर्भात आपली बाजू मांडली. “केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे. त्याचा प्रताप सरनाईकही एक भाग आहे.
मगाशी चर्चा चालू असताना, छगन भुजबळ, अनिल देशमुख यांची नावं घेतली गेली. पण प्रतास सरनाईकचीसुद्धा चौकशी सुरू आहे. सात महिन्यांपासून तपास यंत्रणांना सामोरा जातो, असे सरनाईक म्हणाले.
माझ्या पत्राचं काय झालं ?
“महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत माझासुद्धा खारीचा वाटा आहे. काल मी गृहमंत्र्यांना एक पत्र दिलं. मी सत्ताधारी पक्षाचा शिवसेनेचा आमदार आहे. माझ्यावर होणारे आरोप कदाचित राज्य सरकारवरसुद्धा होत असतील,” असे सरनाईक म्हणाले.
“गृहमंत्र्यांना काल जे पत्र दिलं, त्या संदर्भात पुढे काय झालं? त्याची माहिती सरनाईकांनी गृहमंत्र्यांना देण्याची विनंती केली.
सरनाईक यांनी घोटाळा केला असेल, तर तो गजाआड गेला पाहिजे. त्याला शिक्षा झाली पाहिजे; पण घोटाळा झाला नसेल तर गृहखात्याने ती माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली.